संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘वसंतदादा पाटील’ यांचा जीवन प्रवास | Vasantdada Patil Biography in Marathi

वसंतदादा बंडुजी पाटील अर्थात संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंत दादा यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 ला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात पदमाळे या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. वसंतदादा पाटील यांच्या वडिलांचे नाव बंडुजी पाटील व आईचे नाव रुक्मिणीबाई पाटील होते.

मुख्यमंत्री ‘वसंतदादा पाटील’ यांचा जीवन प्रवास | Vasantdada Patil Biography in Marathi

1918 मध्ये आलेल्या प्लेगच्या महामारीत (साथीच्या रोगात) वसंतदादा यांच्या आई-वडिलांचे एकाच दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात वसंतदादा यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. हलाखीच्या परिस्थितीत वसंत दादा यांचे प्राथमिक शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.वसंतदादा यांनी लहान वयापासूनच अनेक स्वतंत्र चळवळीत सहभाग घेतला. वसंतदादा यांनी ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी स्वतंत्र चळवळीच्या माध्यमातून फोनच्या तारा तोडले, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे यांसारखे देशहिताचे काम करून ब्रिटिशामध्ये दहशत निर्माण केली. स्वतंत्र चळवळीच्या काळात त्यांनी काही काळ तुरुंगवासही भोगला.

1937 साली वसंतदादा यांनी राजकारणात प्रवेश केला. महात्मा गांधींच्या 1942 च्या ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनातही वसंतदादा यांनी सहभाग घेतला.भारत स्वतंत्र झाल्यानंतर नंतर झालेल्या निवडणुकीत (1952) मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. पुढील काळात सुमारे 25 वर्ष वसंतदादांनी सांगलीचे (आमदार व खासदार) म्हणून विधानसभेत व लोकसभेत प्रतिनिधित्व केले.

वसंतदादांनी 1952 ते 1972 या कालावधीत सहकार क्षेत्रात क्रांती घडवली. 1956 साली त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. व त्यानंतर वसंतदादांनी स्वतः शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा याचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण (प्रात्यक्षिक) दिले होते.

वसंतदादांनी आपल्या राजकीय वाटचालीत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक व अध्यक्ष त्याशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ या व्यतिरिक्त अनेक संस्थांचे ते अध्यक्ष होते.

वसंतदादांनी कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसताना सहकार क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय होते. ( 1952 ते 1972 च्या काळात) त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषि उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने वसंतदादांनी केला. सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी सहाय्यक अवजाराचे उत्पादक व कृषी प्रक्रिया उद्योग यांसारखे अनेक उद्योग वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. आज सहकार क्षेत्रात जे जाळे उभे राहिलेले आहे त्यामध्ये वसंतदादांचा मोठा वाटा आहे.

सहकार क्षेत्रातील या अद्भुत कामगिरीमुळेच 1967 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वसंत दादा पाटील हे 1967 ते 1972 च्या दरम्यान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेस शहरी व ग्रामीण भागात मजबूती बनत गेली. ग्रामीण भागातील काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व तो वाढवण्यात वसंतदादांचा मोठा वाटा होता असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर वसंतदादांनी (17 एप्रिल 1977) ला संयुक्त महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर वसंतदादांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

सर्वप्रथम वसंतदादांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात रुजवली. शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या योजना त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविल्या.वसंतदादांनी आपल्या कार्यकाळात वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्वावर स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. या निर्णयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाल्या.

वसंतदादांच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे शैक्षणिक व औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या बदल्या या दुसऱ्या जिल्हा परिषद शाळेत होणे. यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, यांसारखे महत्त्वाचे निर्णय वसंतदादांनी आपल्या कार्यकाळात घेतले.

वसंतदादा पाटील यांनी संपूर्ण राज्याचा विकास विषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि.म. दांडेकर यांची समिती नेमली. वसंतदादा पाटील हे 1977 ते 1985 या दरम्यानच्या काळात दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या कल्पक दूरदृष्टीने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला.

अश्या या थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी व प्रभावी मुख्यमंत्र्याचे निधन 1 मार्च 1989 ला मुंबई येथे झाले.

Note: जर तुमच्याकडे Biography of Vasantdada Patil in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Vasantdada Patil information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

close button