चहापासून जर स्वत:ची सोडवणूक करायची असेल तर तीन पर्याय आहेत. उकाळा, तुळशीचा चहा आणि आयुर्वेदीय औषधी चहा हे तीनही पर्याय आरोग्याला फायदाच फायदा पोहोचविणारे आहेत. त्यातील एकही पर्याय किंचितही हानीकारक नाही. भारतीयांचे राष्ट्रीय पेय कोणते ? असा प्रश्न विचारला तर चहा हेच उत्तर मिळते. इतका चहा घराघरात प्रिय आहे. अती श्रम करणाऱ्यांना चहा प्यायल्यावर स्फूर्ती येते. परंतु चहाचे व्यसन शरीराला नुकसानदायक आहे. चहा रक्त जाळतो. शरीर सुकवितो. पचनशक्ती मंदावतो. चहा म्हणजे विष आहे विष चहा सोडा. पण असे सांगून चहा कुणीही सोडत नाही. चहाला पर्याय हवा असा पर्याय आहे ? होय, नक्की आहे.
हृदयविकार, रक्तदाब आणि स्नायुशैथिल्य यांना स्वतःहून निमंत्रण का देता ?
चहाने आपल्या जीवनात खोलवर प्रवेश केला आहे. चहाचे मूळ स्थान चीन, मलाया व जपान, चीनचे लोक चहाला देवी मानतात. पण एकदा का व्यसन लागले, की देवीचे रूपांतर महामायेत होते.चहात टॅनिन व कॅफिन असत. हे टॉनिन व कॅफिन म्हणजे विष आहे. टॅनिन बारा ते पंचवीस टक्के तर कॅफिन दोन ते साडे तीन टक्के असते. चहात एक प्रकारचे सुगंधित तेलही असते. हे सुगंधित तेल म्हणजे निद्रानाशाला
आमंत्रण आहे. मानवी शरीरावर चहाचा खूपच वाईट परिणाम होतो. उकळलेल्या चहामध्ये टॅनिन ॲसिड अधिक प्रमाणात निर्माण होते. यकृतात तयार होणाऱ्या स्रावाला नुकसान पोहोचविण्याचे काम हेच ते टॅनिन करते. हे टॅनिन रक्तवाहिन्यांच्या भिंती कठीण बनविते आणि ब्लडप्रेशर म्हणजे रक्तदाबाला आमंत्रण देते, रक्ताच्या शरीरातील संचारात अडथळे येतात. हृदयाचे स्पंदन वाढते, हृदयविकाराचे धनी होणे भाग पडते.
टॅनिन व कॅफिनचा परिणाम स्नायुसंस्था व मज्जासंस्थेवरही होतो. चहा मेंदूपेक्षा मांसधातूवर उत्तेजक असा परिणाम करतो. त्यामुळे चहा प्यायल्यावर थकवा कमी झाल्यासारखे वाटते. परंतु चहाच्या सतत सेवनाने पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडणे म्हणजे रोगाला निमंत्रण देणे.
चहामध्ये पोषक घटक नाहीत
एक लक्षात ठेवा की, चहामध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. जे प्रोटीन असते ते चहा उकळविला की जळून जाते. चहातील कार्बोदित व प्रमाण अगदी नगण्य आहे. एकूण हिशोब अशा की, चहा हे पेय पोषक द्रव्यांचा बिलकूल पुरवठा न करणारे असेच आहे. त्यामुळे दारूचे समर्थन जसे कुणी करू नये, तसे चहाचेही कुणी करू नये. असे असले तरी चहा हे बुद्धिजीवींचे आणि थंड प्रदेशात वास्तव्य करणाऱ्यांचे आवडते पेय ठरले आहे. एक तर ते तात्पुरती उत्तेजनाता आणते आणि गरम असते. थंड चहा पिणे कुणी सहसा मान्य करत नाही.
दुधामुळे चहाचे गुण वाढतात का ?
चहात दूध टाकतात. दूध शरीराला आरोग्यदायक आहे. चहामुळे दूध मिळते आणि दूध पूर्णान्न आहे. पूर्णान्न घेण्याची किमया चहामुळे होते असा युक्तिवाद काहीजण करतील. पण चहात दूध असते तरी किती ? 80 टक्के चहा तर 20 टके दूध हे प्रमाण असते ना ? म्हणजे 80 टक्के वीष आणि 20 टक्के आरोग्यदायक सत्त्व असेच ना ? दुर्जनांच्या वेढ्यात मूठभर सज्जनांचा काय टिकाव राहणार ? हाच प्रकार चहाच्या बाबतीत आहे. परिणाम लवकर होतो आणि दुधाचे गुणधर्म जाळून काढतो.
चहातील गुण नगण्य
आता प्रश्न पडतो तो असा की, चहा व्यसन म्हणून न घेता औषध म्हणून घेतल्यास काय होईल ? चहामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत की नाही ? तर त्याचे उत्तर अगदी ‘नाही’ असे देता येणार नाही. थोडेफार गुण आहेत. जसा एखादा मुलगा घराण्याला काळीमा आहे असे म्हणत असताना हळूच म्हणायचे की, तो नालायक खरा पण कधीतरी चांगला वागायचा हो, याचा अर्थ असा की, चहातील थोड्याशा गुणांमुळे चहा प्यालाच पाहिजे असे नाही.
हे वाचा- शरीरात रक्ताची कमतरता आहे? करा या आहाराचा समावेश.
उकाळा कसा कराल ?
सकाळच्या प्रहरी, थंडीत किंवा पावसाळ्यात चहाऐवजी उकाळा प्या. सुंठ, दालचिनी, पुदिना, तुळशीची पाने, वेलची कुटून पाण्यात टाका, वर प्रमाणात साखर किंवा गूळ टाका. काही वेळा पाणी उकळवा. चांगले उकळले की गाळा आणि त्यात दूध टाकून प्या.
अशाच प्रकारे तुळशीचा चहा तयार करता येईल. तुळशीचे 15 ते 20 ताजी पाने दोन कप पाण्यात टाका. त्यात थोडा आल्याचा तुकडा व प्रमाणात गुळ टाका. ते पाणी चांगले उकळवा. दीड कप उरले की, पाणी उतरवा, त्यात थोडे दूध टाका. झाला तुळशीचा चहा जसे ताकातून बनविलेले पियुष मधुर तसा हा तुळशीचा चहा मधुर, नुसता मधुर नाही तर आरोग्यदायी, तुळशीचे गुण त्यात उतरल्यामुळे सर्दी, ताप, खोकला होण्याचा धोकाच नाही.
हृदयाला बलवान बनवा
तिसरा चहाचा प्रकार आणखी आरोग्यदायी आहे. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी हा चहा जरूर जरूर प्या! कारण त्यात अर्जुनाच्या सालीचे चूर्ण आहे. हृदय बलवान करण्यासाठी अर्जुनारिष्ट हे औषध गुणकारी आहे. या अर्जुनारिष्टात अर्जुनसालीचा अर्क असतो. हीच ती अर्जुनसाल चुर्णरुपाने या चहात टाकायची असते.
5 तोळे अर्जुनसाल, अर्धा तोळा सुंठ, अर्धा तोळा दालचिनी, तुळशीची पाने, गुलाबाच्या पाकळ्या प्रत्येकी 15 ते 20, वेलची यांची भुकटी करून चहाप्रमाणे चहा बनविता येईल. हा चहा आयुर्वेदिकदृष्ट्या फारच गुणकारी आहे. ही भुकटी एकदा घरी बनवून ठेवली की काम झाले.चहाच्या व्यसनापासून सुटका तर होईलच, पण एक टॉनिक घेतल्याचे परिणाम शरीरावर होतील. असा चहा बनविण्यासाठी घरातल्या गृहिणीने खास पुढाकार घ्यायला हवा लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वांना या आयुर्वेदिक चहाची सवय लावा. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य याच चहाने करा ! स्वत:च्या देहाचे आरोग्य सुधारा कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुधारा, देही आरोग्य नांदते याची सर्वांनाच प्रचीती द्या.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.