सर्वाधिक उत्सुकता, थरार, रोमांच, भावनांचा कल्लोळ कोणत्या खेळासाठी आणि सामन्यासाठी असतो. असा प्रश्न कुणी केला तर सर्वांचं एकच उत्तर असेल ते म्हणजे भारत-पाकिस्तान मॅच. भारत पाकिस्तान हा फक्त एक सामना नसतो तर त्याला एक प्रकारे युद्धाचं स्वरूप येतं. यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताच्या प्रवासाची सुरुवात आज 24 ऑक्टोबरला पाकिस्तान विरोधातील सामन्याने होणार आहे. जेवढं महत्व विश्वकपच्या फायनल मॅचला असतं. तेवढचं महत्त्व भारत- पाकिस्तान मॅचला असतं. या दोन्ही संघांनी एखाद्या वेळी फायनल मॅच गमावली तरी चालते पण एकमेकांसोबत हरायचं नसतं.
कर हर मैदान फ़तेह, भारत आणि पाकिस्तानचा थरार आणि रोमांचक अनुभव… | India vs Pakistan T20 World Cup History in Marathi
भारत- पाकिस्तान मॅचची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दोन्ही संघाची साधी सीरिज असली तरी त्याचा उत्साह प्रचंड असतो. आता तर दोन्ही संघ टी-20 विश्वकपमध्ये भिडताहेत म्हटल्यावर क्रिकेट रसिकांचा रोमांच सर्वोच्च स्तराला जाऊन पोहचतो. दोन्ही क्रिकेटवेड्या देशांसाठी ती मेजवानीच असते. गेल्या 2019 च्या विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्डवर सामना झाला होता. या सामन्याची प्रेक्षक क्षमता 26000 आहे. मात्र आठ लाख लोकांनी त्याच्या तिकिटासाठी अर्ज केला होता. आजच्या सामन्याची देखील सर्व तिकिटे दोन आठवड्या पूर्वीचं संपली आहेत.
युनायटेड अरब अमिरातीमध्ये ज्या ठिकाणी हा सामना आहे, तेथील सर्व हॉटेल्स हाऊसफुल झाले आहेत. त्यावरुन या सामन्यांबाबत लोकांमध्ये असलेलं वेड लक्षात येईल. टीव्हीवर तब्बल 50 कोटी लोकांनी हा सामना पाहून एक विक्रम रचला होता. एवढ्या लोकांनी तर फायनल मॅच सुध्दा पाहिली नव्हती.कोणत्याही संघाला, कोणत्याही परिस्थितीत हा सामना गमावयाचा नसतो आणि याच भावनेमुळं रोमांच वाढतो.प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूला पाकिस्तानच्या विरोधात चांगली कामगिरी करण्याची इच्छा ही असतेच. आपण दोन्ही संघांच्या सामन्यांचा इतिहास पाहिला तर, हे सामने कायम हाय व्होल्टेज असलेले दिसतात.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीही फार चांगले नव्हते आणि त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या खेळांवरही नेहमीच पाहायला मिळतो. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचं मत भारतानं कायम व्यक्त केलं आहे. त्यामुळं दोन्ही देशांमध्ये शत्रुत्वाची भावनाही असते. शिवाय पाकिस्तान स्वतंत्र देश बनल्यापासूनच कधीही भारताशी त्यांचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. या खराब संबंधांमुळंचं सामन्याला युद्धाचं रुप येतं. या सर्वाची पायभरणी 1952-53 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी मालिकेनं झाली आहे. भारतानं दिल्लीत झालेला पहिला सामना जिंकल्यानंतर लखनऊमध्ये दुसरा सामना गमावला तेव्हा दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरच्या दोन मालिकांमध्ये क्रिकेट खेळाडूंच्या मनात याची भीती असल्याचं पाहायला मिळालं. जिंकलं नाही तरी चालेल, पण हरायचं नाही, यावरच कायम दोन्ही संघांचा जोर पहायला मिळाला आहे. पराभवानंतर चाहत्यांच्या तीव्र आणि हिंसक प्रतिक्रिया या भीतीमागचं कारण होत्या. कारण या पराभवासाठी जबाबदार खेळाडूंच्या घरांबाहेर जाळपोळ दगडफेक ही सर्वसामान्य बाब होती.
गेल्या 10-15 वर्षांमध्ये क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियांची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. आजही दोघांपैकी कोणालाही पराभव मान्य नाही, हे खरं असलं तरीही दोन्ही देशातील चाहत्यांनी पराभव पचवणंही शिकलं आहे. त्यामुळंच तीव्र प्रतिक्रिया उमटत नाहीत. ही एक चांगली गोष्ट झाली आहे. क्रिकेट रसिकांमध्ये रोमांच असावा, भावनांचे हिंदोळे असावे, उत्सुकता असावी, थरार असावा मात्र उन्माद नसावा. आता हा उन्माद कमी होऊन खेळाचा रोमांच अनुभवला जातो आहे. ही चांगली बाब आहे.
आजच्या सामन्यात भारताचं पारडं जड असेल. यापूर्वी टी-२20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान पाच वेळा भिडले आहेत. त्या पाचही वेळा भारत पाकिस्तानवर भारी पडलेला आहे. आता आयपीएल, टी-20 च्या वॉर्म अप मॅच मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. पण पाकिस्तानला कमी लेखून चालणार नाही. तोही जबरदस्त संघ आहे, कधीही बाजी पालटू शकतो. तर चला या खेळाच्या सामन्याच्या आनंद घेऊया. तो थरार आणि रोमांच अनुभवूया.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.