26/11 म्हटलं की डोळ्यासमोर चित्र येतं ते मुंबईतील मोठ्या दहशतवादी हल्ल्याचंच. भारतातील स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 रोजी एक भीषण दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये कित्येकांची स्वप्ने पूर्ण करणारी आणि पाहणारी माणसे मृत्यू पावली आणि तिथेच स्वप्ननगरीचे रूपांतर हे भयनगरीमध्ये झाले. तो दिवस मुंबई आणि समस्त भारतीयांसाठी हादरा देणारा दिवस ठरला.
26/11 च्या हल्ल्यात मुंबईला वाचवणाऱ्या लढवय्यांना नमन! | 26/11 mumbai attack information in marathi
समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं आणि आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात त्या दिवसाच्या जखमा कायमस्वरुपी खोलवर रुजल्या गेल्या. या घटनेला आज जवळपास 13 वर्षे झाली, म्हणजे एक तप पूर्ण झालं. या झालेल्या भ्याड हल्ल्यात सुमारे 166 लोक मृत्यूमुखी पडले तर 300 पेक्षा अधिक लोक हे जखमी झाले. परंतु सामान्य माणसांसोबत काही असामान्य व्यक्ती सुद्धा शाहिद झाल्या. यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
पाकिस्तान मधून आलेल्या या 10 दहशतवाद्यांनी समुद्री मार्ग निवडला आणि ते मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांनी शहरातील एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढवले. यामध्ये दक्षिण मुंबई येथील शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागच्या गल्लीत हे हल्ले झाले. या सर्व ठिकाणी त्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार व हातबॉम्ब फेकले. तसेच माझगाव डॉकमध्ये एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये त्यांनी स्फोट घडवून आणला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे सारी मुंबई नगरी हादरली. लोक सैरावैरा धावू लागले. काहींची तुटलेली डोकी, छिन्नविछिन्न झालेले हातपाय, रस्त्यावर जिकडे तिकडे रक्त आणि आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे पोलीस यांच्याविरुद्ध गोळीबार करत आपल्या जीवाची शर्थ लावून एक प्रकारे युद्धच करत होते. यामध्येच कित्येक लोकांसोबतच आपल्याला देशाची सुरक्षा करणाऱ्या इमानदार आणि निडर पोलीस अधिकाऱ्यांना गमवावे लागले.
या हल्ल्यात मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी हेमंत करकरे, एडिशनल पोलीस कमिशनर अशोक कामटे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी आपल्या जीवाची बाजी लावत दहशतवाद्यां विरोधात गोळीबार केला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणारे हे लढवय्ये शेवटपर्यंत हा हल्ला परतवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण या हल्ल्यात काही गोळी लागून तर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना विरगती प्राप्त झाली. या दहा दहशतवाद्यापैकी एक दहशतवादी अजमल कसाब हा हाती लागला तो साहाय्यक उपनिरीक्षक, मुंबई पोलीस तुकाराम ओबळे यांच्या. त्यांनी या कसाबवर अत्यंत शिताफीने झडप घालून त्याला पकडून ठेवले मात्र या झटापटीत त्यांना स्वतःचे प्राण त्यागावे लागले. परंतु हा दहशतवादी कसाब हाती लागला आणि इतर 9 दहशवतवाद्यांना परलोकी पाठवण्यात आपल्या देशाच्या हिम्मतवान सैनिकांना यश आले.
या लोकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊनच मुंबईला पुन्हा जीवनदान दिले. या महान योध्यांचे स्मरण अजूनही भारतातील प्रत्येक व्यक्ती करते आहे आणि आजच तो दिवस म्हणून या महान शहीदांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा ही प्रत्येक जनमानसात रुजावी हीच प्रार्थना!
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.